Professional Documents
Culture Documents
तिकडे पूतनेचा अंत झाल्याचे वृत्त जेव्हा कं साला कळले तेव्हा त्याला भय वाटले. एवढे विषही शोषण करून
नंदबाल जगला म्हणजे काहीतरी अघटित आहे हे त्याने ओळखले. कृ ष्णाचा नाश करण्यासाठी त्याने शकट
नांवाच्या दैत्याला पाठविले. गोकु ळात येऊन त्या दैत्याने एका गाड्यांत आपण स्वतः सूक्ष्म रूपाने प्रवेश के ला.
अंगणात पर्यंकावर कृ ष्णाला ठेवून यशोदा थोडा वेळ घरात गेली होती. तो गाडा त्याच अंगणात होता. तो
आपोआप सरकत कृ ष्णाजवळ आला. दैत्याच्या प्रेरणेने तो गाडा कृ ष्णावर कोसळणार होता. कृ ष्णाने ते
ओळखले. गाडा जवळ येताच कृ ष्णाने एकदम पायाने लाथ झाडली. तिचा फटका बसताच गाडा उलट्या
बाजूस कलंडून पडला आणि मोडला ! त्याच्या आवाजाने यशोदा पटकन् बाहेर आली ! लगेच धावत जाऊन
तिने कृ ष्णाला उचलले. 'जरा दृष्टीआड झालास की काय काय संकटे येतात रे कृ ष्णा ! के वढा तो गाडा ! दुरून
घरंगळत कसा काय आला न कळे ! तुला लागले नाही हे बरे !' असे म्हणत यशोदा थरथर कापत तिथेच उभी
राहिली. सारे नवल करीत होते. गाड्यात शिरलेल्या शकटासुराला त्यातून दूर जाताच आले नाही. त्याचेही प्राण
गेले ! त्याला कृ ष्णाने पदस्पर्शाने मुक्तीच दिली !
यशोदेला नंद म्हणाला- ' कृ ष्णाला आता क्षणभरही दृष्टीआड करू नकोस, विसरू नकोस, दुर्लक्ष करू नकोस.
कृ ष्णावर संकटे येतात असे दिसते ! प्रभूची लीला अगाध आहे !'
यशोदेचा कृ ष्ण व त्यापेक्षा थोडा मोठा असलेला, रोहिणीचा बलभद्र - दोघे मोठे होऊ लागले. अनेक प्रकारे
प्रगती करू लागले. बलभद्र चालत असे तर कृ ष्ण अजून रांगणाराच होता. दोघे अंगणात खेळत, अनेक प्रकारे
खोड्या करीत, यशोदेला आणि रोहिणीला आनंद देत असत. बलभद्र गोरा होता, कृ ष्ण सावळा होता. एक सूर्य
तर दुसरा चंद्र ! एक शंकर तर दुसरा विष्णू ! हळूहळू दोघे धावत, बागडत, खेळ खेळू लागले. अर्थहीन बोबडे शब्द
बोलता बोलता, समजून उमजून बोलू लागले, आईबाबांना हाका मारू लागले. यशोदेकडे गवळणी कृ ष्णाला
खेळवण्यासाठी येऊ लागल्या. तो हातावरून हातावर नाचविला जाऊ लागला. रोहिणी आणि यशोदा यांची
त्यांना आवरता आवरता पुरेवाट होऊन जाई. बाळलेणी तर किती होती. खोटी खोटी लाकडाची वासरे घेऊन ते
छोट्या काठ्यांनी त्यांना हाकलीत. गोप त्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवीत. उंच उचलून झेलीत, तेव्हा ते
खदखदा हसत. लपंडाव खेळत, कु ठे वासरांच्या मागे धावत, कधी मोरासारखे नाचत, विहिरीजवळ गेले की
यशोदा भरकन् धावे आणि पटकन् उचलून घेई. कृ ष्ण नाचू लागला की गोकु ळातल्या सर्वांचे मन आनंदाने नाचू
लागे, सृष्टी हसू लागे, सूर्याचे कोवळे किरण अंगावर घेत लतावेली व वृक्ष डोलत, पक्षीगण गाणी गात ! दूर
जाऊन अंगणातून दोघे धावत येत आणि यशोदेला भिडत तेव्हा वाटे पराक्रम आणि धर्मच प्रकृ तीला भेटायला
आले ! चौदा भुवनांतील देवता विष्णूच्या बालरूपाचे दर्शन करण्यासाठी सूक्ष्म रूपाने गोकु ळाच्या आसमंतात
जमत; इंद्र त्याना कर्तव्याची जाणीव देऊन स्वस्थानी पाठवता पाठवता स्वतःच ते वैभव पहात तटस्थ होई.
नंदयशोदेचे पूर्वजन्मींचे के वढे पुण्य ! प्रत्यक्ष शेष व विष्णू त्यांच्या अंगणात आणि अंगाखांद्यावर खेळत आणि
परमोच्च आनंद देत ! अहो, वेदांना अगम्य विराटपुरुष गोकु ळात गोपांकडून बोबडे बोल शिकत होता ! आणि
ज्याचे रहस्यमय वचन देवांना आकलन होत नाही त्याचे बोबडे बोल गोपगोपींना कळत नव्हते ! ते दोघे ज्या
क्रीडा करीत त्यांनी शहाणी शहाणी माणसेही त्यांच्यासाठी वेडी होत.
इकडे आनंदाला भरती आली होती पण तिकडे कं साच्या सभेत तृणावर्त नांवाचा दैत्य कृ ष्णाचा घात करण्याची
प्रतिज्ञा करीत होता ! झंझावाताचे रूप घेऊन कृ ष्णाला आकाशात उडवून न्यावे व खाली फे कू न मारून टाकावे
असा त्याचा बेत होता. कं साची आज्ञा घेऊन तो सूक्ष्म रूपाने गोकु ळात आला. कृ ष्ण अंगणात खेळत होता.
अचानक वावटळ उठली. धूळ उडून काही दिसेनासे झाले. तृणावर्ताने वायूच्या झोताबरोबर बालकृ ष्णाला
आकाशात उंच नेले ! कृ ष्णाला हे दैत्याचे रूप कळले. त्याने आपले शरीर अत्यंत जड के ले आणि आपल्या
अचिंत्य योगशक्तीने तृणावर्ताला त्याचे स्वतःचे रूप घ्यायला लावले; तो तृणावर्ताच्या मानेला मिठी मारून
खांद्यावर बसला; त्याची मान आवळू लागला. गोकु ळापासून दूरवर तृणावर्ताने त्यावेळी कृ ष्णाला वाहून नेले
होते. कृ ष्णाची अशी काही घट्ट मिठी त्याच्या गळ्याला बसली की त्याचा गळा आवळला जाऊन तो गतप्राण
झाला. उंचावरून धाडकन भूमीवर कोसळला ! वावटळ शमली, धूळ खाली बसली. वादळाने वृक्ष मोडून पडले
होते, तृणावर्ताच्या प्रचंड शरीराखाली आणखीनच पुष्कळ वृक्षांचा चुराडा झाला ! कृ ष्ण मात्र त्या दैत्याच्या
खांद्यावर बसून राहिला होता !
गोकु ळवासी भराभर घराबाहेर पडले ! वृक्षांची, गोठ्यांची नासधूस झालेली ! दैत्य पडताच झालेल्या आवाजाने
सगळे अरण्याकडे धावले ! पहातात तो मोठा दैत्य आडवा पडलेला, आणि कृ ष्ण त्याच्या खांद्यायर बसलेला !
गोपांनी त्याला उचलून आणले ! यशोदा धावतच येत होती ! तिच्या हाती कृ ष्णाला देत गोपांनी सर्व प्रकार
तिला दाखविला ! कृ ष्ण यशोदेच्या जवळ बसून दैत्याकडे बोट दाखवून हसत होता !
तृणावर्त दैत्याचे हे आणखी एक संकट ! गोकु ळवासी चिंतातुर झाले ! निसर्गातील विध्वंसक शक्तीचे रूप घेऊन
दैत्य कृ ष्णावर हल्ला करीत होते !
"किती वेळा तुला आंघोळ घालू ? पुन्हा पुन्हा मातीत खेळतोस !" असे लाडाने म्हणत यशोदा कृ ष्णाचे अंग
पुशीत होती. त्यावेळी अचानक कृ ष्णाला आली जांभई. यशोदेने पाहिले तो त्याच्या तोंडात अनेक विश्वे ! तिचे
भानच हरपले ! काय झाले ते कृ ष्णाला कळले ! त्याने पटकन् तोंड मिटले. आईला शुद्धीवर आणले. तिने जे
पाहिले त्याचा तिला विसर पाडला.
तिने एकदा त्याला पाळण्यात निजवून गाणी म्हटली. विष्णूच्या पूर्वीच्या अवतारांची गाणी. त्यात मत्स्यावतार,
कू र्मावतार वगैरे वर्णने आली. पुढे रामावताराचे वर्णन आले. तेव्हा तिला एकदम दिसले की कृ ष्ण पाळण्यात
नाही. रामाच्या रूपात आपल्यापुढे उभा आहे. बाण मारत आहे. तो भास जाऊन तिला कृ ष्ण पुन्हा पाळण्यात
आहे असे दिसले ! तिला कोठले खरे तेच कळेना.
एकदा तर यशोदेला कृ ष्ण घरात असूनही दिसेना. तिने शोधले पण सापडेना. झाले होते ते असे की निळासावळा
कृ ष्ण निळ्या स्कटिकमय भूमीवर गप्प बसला होता. तो कसा दिसणार ? परब्रह्म जवळ आणि जीव करतो
धावपळ अशीच स्थिती झाली ! तेवढ्यात कृ ष्णच जागचा उठला. आईला हाका मारू लागला. तेव्हा दिसला.
कृ ष्ण हरवला म्हणून तिने गोपींनाही शोध करायला बोलायले होते. सर्वांना आपली फसगत झालेली कळताच
हसू आले. मग यशोदेने कृ ष्णाला मांडीवर घेऊन स्तनपान करविले. श्रोतेहो ! त्याचे वर्णन शुकमुनी
वैशंपायनाजवळ करीत होता. त्यांचेही भान हरपून कृ ष्ण कृ ष्ण असे तो म्हणू लागला. कथा सांगण्याचे तो
क्षणभर विसरूनच गेला !
अध्याय ५ समाप्त
॥ श्रीकृ ष्णार्पणमस्तु ॥